फेब्रुवारी २०१ महिन्यात करावयाची शेतीची कामे. (पुणे जिल्हा)

पुर्वहंगामी उस पीक १२ ते १६ आठवड्याचे झाले असल्यास बांधणीचेवेळी १३६ किलो नत्राचा (३०० किलो युरीया) चौथा हप्ता द्या. पालाश व स्फुरद खतांचा प्रत्येकी ८५ किलोचा (सुपर फॉस्फेट ५३४ किलो व म्युरेट ऑफ पोटँश १४० किलो) हप्ता द्या.
काणीग्रस्त व गवताळ बेटे आढळून आल्यास अशी बेटे खोदून काढून त्यांचा संपुर्ण नायनाट करा.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसांनी नियमीत पाण्याच्या पाळ्या द्या. पाणी पुरवठा कमी असल्यास जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करणेसाठी प्रती हेक्टरी ५ ते ६ टन पाचट जमिनीवर पसरावे. तसेंच पाण्याची बचत करणेसाठी एक आड एक सरीत पाणी द्यावे.

खोडवा ऊस ऊस तोडणी झाल्यानंतर लगेच धारदार कोयत्याने ऊसाचे बुडखे जमिनीलगत छाटून घ्यावेत. त्यानंतर नांगराने बगला फोडून पाचट गाडावे. नंतर पहिल्या पाण्याचे पाळीबरोबर हेक्टरी ७५ किलो नत्र + ११५ किलो स्फुरद + ११५ किलो पालाश (१६५ किलो युरिया + ७२० किलो सुपर फॉस्फेट + १९० किलो म्युरेट ऑफ पोटँश) द्यावे. वरील सर्व कामे ऊस तोडणीनंतर १५ दिवसांच्या आत पुर्ण करावीत.
ऊस तोडणीनंतर ६ ते ८ आठवड्यानी ७५ किलो नत्राचा (१६५ किलो युरीया) दुसरा हप्ता द्या व बांधणीच्यावेळी हेक्टरी १०० किलो नत्राचा (२१५ किलो युरिया) तिसरा हप्ता द्या.
टीप पंधरा फेब्रुवारीनंतर तोडलेल्या ऊसाच्या खोडवा ठेवू नका. ठेवल्यास खोडकीडीचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात मोटी घट येते.

सुरू ऊस सूरू ऊसाची लागण होऊन ६ ते ८ आठवडे झाले असल्यास हेक्टरी १०० किलो नत्राचा (१२० किलो युरिया) दुसरा हप्ता द्या. नत्र युरीया खतामधून द्यावयाचा असल्यास त्यावर निंबोळी पेंडीच्या बारीक भुकटीची प्रक्रीया करा. ६ किलो युरियास १ किलो निंबोळी पेंड या प्रमाणात मिश्रण करा. निंबोळी पेंडीचा वापर नत्राचा दुस-या व चवथ्या हप्त्याच्यावेळी करावा. निंबोळी पेंडीच्या वापरांमुळे नत्र खतात बचत होऊन पिकास नत्र गरजेनुसार उपलब्ध होते. (सुरू ऊसाच्या सविस्तर लागवडीनंतर माहे जानेवारी २००६ च्या कृषि संदेशाचे अवलोकन करावे.)

खोडकीडीच्या नियंत्रणासाठी
१) हेक्टरी २५ कामगंध सापळे शेतात लावावेत.
२) खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.
३) हेक्टरी ४ फुले ट्रायकोकार्ड १० दिवसाच्या अंतराने ५ वेळा लावावीत.
४) दाणेदार सेव्हीडॉल २५ किलो अथवा क्लोरोपायरीफॉस २० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे नंतर हलकेसे पाणी द्यावे.


ऊसावरील पांढरा लोकरी मावा

ऊसावरील पांढरा लोकरी मावा नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ३५ टक्के ५०० मि.ली. + मेटँसिस्टॉक १००० मि.ली. आणि ५०० मि.ली. स्टीकर अथवा ५ किलो डिटर्जंट पावडर ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी. ही किड मुख्यत्वेकरून पानाच्या खालील बाजूस दिसून येते. त्यामुळे किटकनाशकाची फवारणी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर १५ दिवसांनी क्रायसोपर्ला अथवा डिफा अथवा मायक्रोमास या परभक्षक किडीच्या २५०० अळ्या प्रतिहेक्टरी ऊसावर सोडाव्यात म्हणजे लोकरी मावा किडीचे जैविक पध्दतीने नियंत्रण होईल अथवा एन्डोसल्फान ३५ टक्के ५०० मिली. + अँसीफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी १००० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतीहेक्टरी फवारावे.

रब्बी पिके
हरभरा

हरभ-यावरील घाटे आळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. या विषाणूचा अवलंब करावा. एच.एन.पी.व्ही. या विषाणूमुळे शेतात अळ्या रोगट बनतात. त्यामुळे त्यांची वाढ न होता त्या मरतात. अशा ५०० रोगग्रस्त अळ्या पाण्यात ठेचून त्याचे द्रावण फडक्यातून गाळून प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. एन.पी.व्ही. ची फवारणी अळी लहान अवस्थेत असतानाच करावी. अळी मोठी झाल्यानंतर फवारणी केल्यास फारसा उपयोग होत नाही. प्रखर सुर्यप्रकाशामुळे औषधाची तीव्रता कमी होते. त्यामुळे फवारणी दुपारी ३ ते ४ वाजेनंतर करावी. पहिली फवारणी अळ्या दिसू लागताच करावी. व दुसरी फवारणी १५ ते २० दिवसांनी करावी किंवा पहिल्या फवारणीनंतर १५ ते २० दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पक्षांद्वारा अळ्यांचे नियंत्रण करणेसाठी शेतात ठिकठिकाणी मचाण उभारावे. कामगंध सापळे ५ प्रती हेक्टरी लावावेत.
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ३५ इ.सी. १००० मि.ली. किंवा क्विनॉलफॉस (इकँलक्स) २५ इ.सी. १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतीहेक्टरी फवारावे किंवा एन्डोसल्फान ४ टक्के भुकटी किंवा मँलेथिऑन ५ टक्के भुकटी किंवा क्विनॉलफॉस १.५ भुकटी प्रतीहेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी.

सुर्यफूल

करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मँन्कोझेब (एन्डोफील एम ४५) १५ ग्रँम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी ५०० लिटर या प्रमाणात फवारावे.
सुर्यफुलावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी एस.ओ.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. अथवा ५ टक्के निंबोळी अर्क अथवा एन्डोसल्फान ३५ इ.सी. १००० मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. १००० मि.ली. प्रतीहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किडींचे अंडीपुंज, अळ्या गोळा करून नाश करावा. मँलेथिऑन ५ टक्के किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २५ किलो या प्रमाणात धुरळावी.

गहू

तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मँन्कोझेब ७५ टक्के १५०० ग्रँम अधिक ५०० लिटर पाणी या द्रावणात १० किलो युरीया मिसळून प्रतीहेक्टरी फवारणी करावी.

करडई

करडईवरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला कार्निया या परभक्षक किडीच्या १० ते १५ हजार अळ्या प्रतिहेक्टरी सोडाव्यात अथवा व्हर्टीसिलीयम लिकयानी ४ ग्रँम प्रती लिटर पाण्यातून फवारावे. अथवा एन्डोसल्फान ३५ इ.सी. ७०० मि.ली. किंवा डायमेथोएट रोगार ३० इ.सी. ५०० मि.ली. प्रतीहेक्टरी ५०० लिटरी पाण्यात मिसळून फवारावे. किंवा कार्बारील १० टक्के भुकटी किंवा एन्डोसल्फान ४ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी.


उन्हाळी पिके
भुईमूग पेरणी १५ फेब्रुवारीपर्यत पूर्ण करावी. पेरणी वाफश्यावर करावी.
१) प्रकार उपटया
पेरणी अंतर ३० X १० से.मी.
बियाणे १०० ते १२० किलो प्रती हेक्टर
२) प्रकार निमपस-या
पेरणी अंतर ३० X १५ सें.मी.
बियाणे ८० ते ९० किलो प्रतीहेक्टर
३) प्रकार - पस-या
पेरणी अंतर ४५ X १० सें.मी.
बियाणे ७० ते ८० किलो प्रतीहेक्टरी

पेरणीपुर्वी एक किलो बियाण्यास २.५ ग्रँम या प्रमाणात कार्बेन्डँझिम किंवा बुरशीनाशक अथवा ५ ग्रँम ट्रायकोडर्मा बुरशानाशक प्रतिकिलो याप्रमाणे वापरून प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाण्यास २५० ग्रँम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात रायझाबियम + स्फुरद विरघळणारे जिवाणूसंवर्धनाची बीजप्रक्रीया करावी.
रासायनिक खते हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद संपुर्ण पेरणीच्यावेळी द्यावे + १२५ किलो जिप्सम पेरणीच्यावेळी व १२५ किलो पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
सुधारीत वाण सुधारीत वाणांचा वापर करा. पेरणीसाठी एस.बी.११, टी.ए.जी.२४, टी.जी.२६, आय.सी.जी.एस.११, एम.१३, टी.पी.जी.-४१ अथवा कोयना यापैकी वाणाची निवड करावी.


सूर्यफूल

पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करा.
पेरणी अंतर ६० X ३० सें.मी. (भारी जमिन)
४५ X २२.५ सें.मी. (मध्यम जमीन)
बियाणे हेक्टरी १० किलो
पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर २५० ग्रँम व स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.
रासायनिक खते ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रतीहेक्टरी द्यावे. अर्धे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी द्यावे व अर्धे नत्र ३० दिवसांनी द्यावे.
सुधारीत वाण ई.सी.६८४१४, मॉर्डेन, एस.एस.५६
संकरीत वाण के.बी.एस.एच.११, ए.पी.एस.एच.११


उन्हाळी बाजरी
उन्हाळी हंगामातील ढगविरहीत स्वच्छ हवामान, भरपूर सूर्यप्रकाश व पिकाच्या वाढीस योग्य तापमान व हवामानाचे इतर घटक उन्हाळी हंगामात बाजरी पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे उन्हाळी हंगामातील बाजरीचे उत्पादन (धान्य व चारा) खरीप हंगामापेक्षा सव्वा ते दिडपटीपेक्षा जास्त येते म्हणून ज्या ठिकाणी उन्हाळ्यात सिंचनासाठी पाण्याची सोय ५-७ पाण्याच्या पाळीचे सोय असेल अशा ठिकाणी उन्हाळ्यात बाजरीची लागवड करणे खूप फायदेशीर आहे. त्यासाठी पुढील तांत्रीक बाबींचा अवलंब करून उन्हाळी बाजरीची लागवड करावी.
१) उन्हाळी बाजरीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी खोलीची, पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन निवडावी.
२) जमिनीची पूर्वमशागत करताना १५ सें.मी. खोलीपर्यंत १ नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
३) जमिनीत असलेल्या पूर्वीच्या पिकाची धसकटे, हरळी, कुंदा यांच्या काड्या वेचून जमीन स्वच्छ करावी.
४) दुस-या कुळवणीअगोदर हेक्टरी ६ ते ७.५ टन (१२ १५ बैलगाड्या) शेणखत अथवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे व दुस-या कुळवाच्यावेळी ते जमिनीत चांगले मिसळावे.
५) पेरणी उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी जानेवारीचा दुसरा पंधरवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यत पूर्ण करावी.
६) वाण पेरणीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापिठाने प्रसारीत केलेल्या श्रध्दा व सबुरी या संकरीत वाणाचा वापर करावा.
७) बियाणे हेक्टरी ३-४ किलो प्रमाणीत बियाणे वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास अँझोस्पीरीलम हे जिवाणूखत १०० ग्रँम प्रती ४ किलो बियाण्यास चोळून बिजप्रक्रीया करावी. त्यामुळे नत्रात २० ते २५ टक्के बचत होते. पेरणी करणेपुर्वी शेत ओलवून वापसा आल्यावर पेरणी करावी. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी व खत एकत्र पेरता येते. ३० सें.मी. अंतराची पाभर वापरावी. उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी विरळणी करून दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे म्हणजे हेक्टरी दोन लाख वीस हजार रोपे एक हेक्टर क्षेत्रात राहतात. पेरणीच्यावेळी हेक्टरी ४५ किलो नत्र, ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश उन्हाळी बाजरी पिकास द्यावे. नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी यरिया खताद्वारे हेक्टरी ४५ किलो याप्रमाणे द्यावा. पेरणीनंतर पिकास ३-४ दिवशी पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १०-१२ दिवसाचे अंतराने ५-७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

अंतरमशागत तणांचा बंदोबस्त करणेसाठी दोन वेळा खुरपणी देऊन पीक पेरणी केल्यापासून ३० दिवसापर्यंत तणविरहीत ठेवावे.

फळबाग व भाजीपाला
आंबा, नारळ जानेवारी महिन्यात दिलेले १ ते ८ संदेशाचे अवलंबन करा. नवीन लागवड केलेल्या आंबा किंवा नारळाचे उन्हापासून संरक्षण करा. आंब्याच्या मोहोराचे तुडतुडे व भुरी रोगापासून संरक्षण करण्यासाठी ५० टक्के वेटेबल कार्बारील २० ग्रँम + ८० टक्के वेटेबल गंधक २० ग्रँम किंवा ३५ टक्के एन्डोसल्फान (प्रवाही) १५ मि.ली. + १० ग्रँम कार्बेन्डँझिम दहा लिटर पाण्यास या प्रमाणात घेऊन मोहोरावर व झाडांच्या शेंड्यावर फवारावे. बागेतील मोहोर न आलेल्या झाडावरही औषध फवारणी करावी.
मोहोराची फुलगळ थांबविण्यासाठी व फळधारणा वाढविण्याकरीता मोहोरावर १० पी.पी.एम.एन.ए.ए. ह्या संजिवकाचा फवारा द्यावा. फळांची गळ कमी करण्यासाठी फळांचा आकार वाटाण्याएवढा झाल्यावर (०.५ सें.मी.) व द्राक्षमण्याएवढा (१ सें.मी.) झाल्यावर २० पी.पी.एम. तीव्रतेचे एन.ए.ए. या संजीवकाचे दोन फवारे द्यावेत.

कलिंगड कलिंगडाच्या चांगल्या उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीसाठी प्रत्येक वेलीवर २ ते ३ फळे ठेवावीत.
डाळींब डाळींब पिकाच्या वर्षातून एकच बहार घ्यावा. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास चांगल्या व दर्जेदार फळांसाठी आंबेबहार घ्यावा. अपुरा पाणीपुरवठा असल्यास मृग किंव हस्त बहार घ्यावा. डाळींबाची कलमे रोग असलेल्या झाडावर बाधू नयेत. कलमे बांधणेसाठी निरोगी झाडे निवडावीत. डाळींबाच्या चांगल्या प्रतीसाठी फळांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. ५ ते ७ वर्षाच्या झाडावर ६ ते ८ डझन फळे घ्यावीत. विरळणीसाठी घोसामधील जादा फळे, रोगट व किडग्रस्त फळे काढून टाकावीत. पूर्ण वाढलेल्या बागेतून १० ते १२ टन उत्पादन मिळते. प्रत्येक पूर्ण वाढलेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत ३२५ ग्रँम नत्र, २५० ग्रँम स्फुरद अधिक २५० ग्रँम पालाश ही खते झाडास बहार धरणेच्यावेळी द्यावीत. एक ते दिड महिन्यानंतर आणखी ३०० ग्रँम नत्र द्यावे.
निंबोळी पेंडीचा वापर करा.


उन्हाळी भाजीपाला कांदा, मिरची, वांगी, भेंडी, कारली, दोडका, दुधी, टरबूज, काकडी, गवार या उन्हाळी भाजीपाल्याच्या लागवडी पूर्ण कराव्यात.

पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र

म्हशीचे शास्त्रोक्त संगोपन
आपल्या एकूण दुध उत्पादनात म्हशींच्या दुधाचाही मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चा-याचे उत्तम प्रतीच्या दुधात रुपांतर करणेची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धात्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रीतीने करणेची गरज आहे. दुध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठीसुध्दा म्हशींच्या किंवा रेड्यांचा वापर केला जातो.

म्हशींच्या जाती
१) मु-हा (दिल्ली) उत्तर भारतात तसेंच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीर बांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण १८०० ते २००० लिटर असते.
२) मेहसाणा ही जात सुरती व मु-हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून शरीरवैशिष्ट्ये मु-हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी २००० लिटर पर्यंत दूध देतात.
३) पंढरपुरी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठीकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यत पोहोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हशींचे वजन साधारण ४०० किलो व रेड्याचे वजन ५०० किलो असते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यात पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणा-या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धात्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देतात.
४) सुरती शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगोनी झाकलेले असतात. भुवयाचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्यांच्या आकारांची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन १८०० लिटर असते. जास्त काळ दुध देते व दुधात स्निग्धांश जास्त असतो.

म्हशींची पैदास
म्हशींचे प्रजोत्पादन करणेसाठी शुध्द जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणा-या व जास्त दुध देणा-या म्हशींपासून पैदा झालेला वळू निवडावा व त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातींची शुध्दता व वैशिष्टये जतन करावीत. निवड पध्दतीनेच म्हशींमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. त्यापासून मिळणा-या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते. जनावर व्याल्यावर २ महिन्याने वळू दाखवावा व विण्यापुर्वी एक ते दिड महिना जनावर भाकड करावे.
माजाची लक्षणे बहुतांशी म्हशी सुर्योदयापुर्वी व सुर्यास्तानंतर माजावर येतात. म्हैस वारंवार लघवी करते, निरणाचे कातडीवर पांढरट क्षार दिसतात. माजावरील म्हशीचे निरण सुजल्यासारखे दिसते. निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. म्हैस पान्हा चोरते, कास व सड ताठरलेले दिसतात. माजावरील म्हशींच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंच उंचावते.
आहार व निगा
क्षमतेएवढे दूध मिळणेसाठी सर्वासाधारणतः ४०० किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज हिरवा चारा व ७ ते ८ किलो कोरडा चारा तिची भूक भागवणेसाठी व शरीर पोषणासाठी द्यावा. दूधनिर्मीतीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५० ट्क्के खुराक द्यावा म्हणजे दुध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी ६० ते ७५ लिटर पाणी रोज लागते.

गारपिटीनंतर घ्यावयाची काळजी
१) गारपीटीनंतर हवेत थंडावा निर्माण होतो. थंडीपासून फळबागेचे संरक्षण करणेसाठी त्याचदिवशी बागेस विहीरीचे पाणी देऊन हलके हलके ओलोत करावे.
२) द्राक्षे किंवा बोर बागेची फळगळ झाली असल्यास तात्काळ स्वच्छता करावी.
३) ऊस, ज्वारी पिकाची पड झाली असल्यास पीक बांधणी करावी.
४) बागेभोवती बांधावर काडीकच-याचे ढीक करून ते पेटवून शेकोट्या कराव्यात.
५) झाडाच्या खोडाभोवती व आळ्यात गवत, पालापाचोळा इ.चे जमिनीवर आच्छादन करावे.
६) थंड हवामानामुळे द्राक्षे पिकावर झॉन्थोमोनस करपा आणि केवडा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते तेव्हा पिकावर प्रति जैविके आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या द्याव्यात. उदा. स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रँम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराईड १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे अणुजीवजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होईल.
७) द्राक्षावरील केवडा रोगासाठी रेडोमिल एम.झेड.७२ ची ०.४ (१०० लिटर पाण्यात ४०० ग्रँम रेडोमिल एम.झेड.७२ या प्रमाणात) फवारणी करावी.
विशेष सुचना
१) विविध पिकांच्या लागवडी संबंधी अद्ययावत शास्त्रीय माहिती शेतक-यांना व्हावी म्हणून श्रीसुगी व शेतकरी मासिकाचे जास्तीतजास्त वर्गणीदार करा. तसेंच महात्मा फुले विद्यापिठाने केलेली कृषि दर्शनी २००६ आपल्या माहितीसाठी संग्रही ठेवा.
२) दुरदर्शनवरील सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६.३० वाजता प्रक्षेपित केला जाणारा आमची माती आमची माणसे हा कार्यक्रम पाहा.

 

कृषि विज्ञान केंद्र, बारामती.